loader image

कोविड व्यवस्थापनाच्या ‘मुंबई मॉडेल’चं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केलं !

कोविड काळात ज्यापद्धतीने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला सांभाळलं, त्यामुळे महाराष्ट्राने त्यांना ‘कुटुंबप्रमुख’ हा बहुमान दिला!

२०१९ च्या अखेरीस महाराष्ट्रात नुकत्याच निवडणुका पार पडल्या होत्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, आणि ते ‘शेतकरी कर्जमाफी’सारखे कल्याणकारी निर्णय घेत असतानाच ‘कोविड १९’चं अभूतपूर्व आव्हान आपल्या जगासमोर आलं.

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी टाळेबंदी आवश्यक होती पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कुठेही आततायीपणा, भीतीचं वातावरण निर्माण न करता जनतेला पूर्वकल्पना देत टाळेबंदी आणली.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी प्रशासनावर लक्ष केंद्रित केलं. तज्ञ डॉक्टरांचा टास्कफोर्स तयार केला. प्रशासनाला पूर्ण मोकळीक दिली.

उद्धवजी एकीकडे राज्यकर्ता म्हणून जितके धीट होते तसेच दुसरीकडे कुटुंब प्रमुखाप्रमाणे जनतेशी आपुलकीने संवाद साधायचे, जनतेपासून काहीही न लपवता सर्व स्थितीची माहिती द्यायचे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे.

मुंबईच्या तत्कालीन आयुक्तांच्या कोविड कार्यकाळावर आधारित ‘COVID WARRIOR – Iqbal Singh Chahal’ ह्या पुस्तकातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात बजावलेल्या आश्वासक भूमिकेची इनसाईड स्टोरी थक्क करणारी आहे.

मुंबईला वाचवणारं ‘जंबो कोविड केंद्र’ उभं करण्यासाठी उद्धवजींनी दिवसरात्र अधिकाऱ्यांसह बसून तातडीने प्रशासकीय मंजुरी आणल्या. या जंबो कोविड केंद्रांशिवाय मुंबई कोरोनाच्या पहिल्या लाटेत तग धरू शकली नसती.

वांद्रे-कुर्ला संकुलातील हे पहिलं ‘कोविड जंबो रुग्णालय’ १८ दिवसांच्या विक्रमी वेळेत बांधलं. जिथे १० लाखाहून अधिक कोविड रूग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले.

विषाणूमधील बदल आणि संसर्गाचं केंद्रस्थान कळावं म्हणून उद्धवजींनी मुंबईच्या नायरच्या संलग्न कस्तुरबा रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिली जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारली आणि त्यामुळे कोरोना व्हायरसमधील म्युटेशन्स (जीन बदल) वेगाने शोधण्यात मदत झाली.

मुंबईत ‘चेस द व्हायरस’ अभियान आक्रमकपणे राबवलं. दारोदारी चाचण्या, शोधमोहीम, तपासणी, प्राथमिक उपचार, जनजागृती केली. टीकेचा भडीमार सुरु होता, अफवांचा बाजार उठला होता पण उद्धवजींनी कोणताही राजकीय दबाव सरकारी, वैद्यकीय यंत्रणांवर येऊ दिला नाही.

तसंच, आदित्य उद्धव ठाकरेंनी कॉर्पोरेट्च्या मदतीने वरळी डोममध्ये ६०० हून अधिक कोविड खाटा आणि कोविड आयसीयूंसह पहिलं ‘जंबो फील्ड हॉस्पिटल’ उभारलं.

कोविड विरुद्धच्या लढाईत आदित्य उद्धव ठाकरे २४x७ सक्रिय असत. आदित्यजींना कोविड संसर्ग झाल्यानंतरही त्यातून बरे होताच त्यांनी पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये, कंटेनमेंट झोनमध्ये दररोज फेरफटका मारायला सुरुवात केली.

पहिल्याच टप्प्यात कॉर्पोरेट्च्या सामाजिक बांधिलकी निधीतून (CSR) मुंबईला १० लाख लसींचा साठा मिळवून देण्यात पालकमंत्री आदित्य उद्धव ठाकरे ह्यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोफत लसीकरण शक्य झालं.

अवघ्या काही महिन्यात ४८,००० खाटा, ३,९०० ICU आणि १५०० बालरुग्ण खाटांची ११ जंबो सेंटर्स आणि १८४ हॉस्पिटल्स कोविडसाठी सज्ज करण्यात आली.

मुंबई महापालिकेला रुग्णवाहिका कमी पडत आहेत हे तत्कालीन आयुक्तांकडून समजताच आदित्यजींनी तातडीने पाठपुरावा सुरु केला आणि पुढच्या फक्त ५ दिवसांतच ८०० वाहनांची व चालकांची व्यवस्था करण्यात आली.

देशात प्रथम आपल्या शहरातच ऑक्सिजन निर्मिती करण्याचा उद्धवजींचा मानस निर्णायक ठरला. लसींची जेव्हा टंचाई भासू लागली त्याची कारणं काहीही असतील पण उद्धवजींनी प्रशासनाचा धीर खचू दिला नाही. त्यांनी प्रशासनाला, राज्याला आश्वासित केलं कि, “लस मिळणार. आपण तयार राहू.”

अनेक प्रशासकीय अधिकारी सांगतात, तेव्हाच्या बैठकांमध्ये उद्धवजी अतिशय शांत, पद्धतशीर, तथ्यांवर, तर्कावर आधारित चर्चा करायचे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या, “टीका होईल म्हणून कोणतेही आकडे लपवू नका, खऱ्या माहितीवर काम करु. आपण जिद्दीने लढू आणि नक्की ह्या संकटावर मात करू. ”